शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं – अजित पवार
शबनम न्युज | मुंबई
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार होती. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, “आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाची कामं गतिमान होतील सभागृहाची अपेक्षा आहे. आपलं नाव जोडलं गेलं आहे हा मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे”.
ते पुढे म्हणाले कि, “राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी केला आहे. तुमच्याकडूनही तीच अपेक्षा आहे. तुमच्या रुपाने एक अभ्यासू, तरुण नेतृत्व सभागृहाला मिळालं आहे. मुंबई, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व आहे. आदित्य ठाकरेंसोबतही तुम्ही काम केलं. मला मावळमध्ये उमेदवार हवा होता तेव्हा मी तुम्हाला विनंती केली. मोदी लाटेत राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला. पण ते फार हुशार आहेत, माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा असं सांगितलं होतं,” असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
“राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही,” असं मिश्किल भाष्य करत अजित पवारांनी टोला लगावला आहे.
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असंही अजित पवार म्हणाले.