शबनम न्युज | पुणे
कॅप्रीकॉन ग्रीन पार्क सोसायटी, कोंढवा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ गांधीविचार ‘ विषयावर अभ्यासक संकेत मुनोत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. उपस्थितांना गांधी विचाराच्या पंचसूत्रीची शपथ देण्यात आली.संकेत मुनोत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले .
नवीन उद्योजकांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्सचे उदघाटन कुमेल रझा यांच्या हस्ते तर फॅशन शो , वक्तृत्व , मिमीक्रि वेगवेगळ्या स्पर्धा यांचे पारितोषिक वितरण पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ.आफताब शेख यांच्या हस्ते झाले. सामाजिक कर्यकर्ते आर्किटेक्ट अझिमभाई शेख यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष परिश्रम घेतले. कॅप्रीकॉर्न ग्रीन पार्क सोसायटी आणि अनुष्का डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
मनोगत व्यक्त करताना संकेत मुनोत म्हणाले की, ‘ देशभक्ती ही कृतीतून म्हणजे जनतेच्या कामातून दिसली पाहिजे .फक्त प्रतिकांतून आणि भाषणातून नव्हे.आई-वडिलांची प्रत्यक्ष सेवा करणार्या मुलांना सतत त्यांचा जयजयकार करावा लागत नाही किंवा त्यांचे मोठ-मोठे फोटो आणि फ्लेक्स करून जाहिरातबाजी करण्याची गरज पडत नाही.
महात्मा गांधी नसते तर ब्रिटिश गेल्यावर भारत हे राष्ट्र निर्माण न होता 550 संस्थानिकांचे कडबोळे झाले असते. आज धर्माच्या नावाने द्वेष पसरवून पुन्हा काही लोक देश तोडण्याचे प्रयत्न करत असताना आपण गांधीविचारांनी एकत्र येत आपापसात प्रेम आणि संवाद वाढवला पाहिजे.यात सर्वांना पंचसूत्रीची शपथ देण्यात आली. रचनात्मक काम आणि प्रबोधन यासाठी जयहिंद लोकचळवळ जॉईन करण्याचे आवाहन यावेळी संकेत मुनोत यांनी केले.
‘स्वातंत्र्यसैनिक जसे नेताजी बोस , गांधीजी ,भगतसिंग यांच्यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गाबद्दल मतभेद असले तरी मनभेद नव्हते. स्वातंत्र्य हे त्यांचे ध्येय एक होते आणि एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता. सुभाषचंद्र बोस यांनी परदेशात जाऊन आझाद हिंद सेना तयार करून त्यात गांधी, नेहरू , आझाद यांच्या नावाने ब्रिगेड तयार केल्या. म. गांधींच्या चळवळीमुळे तळागाळातील सामान्य माणूस स्वातंत्र्यासाठी जागृत झाला, जात धर्म आणि सर्व भेद विसरून पूर्ण देश एकत्र आला आणि संस्थानिकांनाही लोकशाही स्वीकारत प्रजासत्ताक भारतात विलीन व्हावे लागले‘, असेही ते म्हणाले.