शबनम न्युज | मुंबई
माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हटलं आहे. ५० खोके (कोटी) घेऊन गद्दारी केल्याचा आरोप शिंदे गटावर केला जात आहे. याच मुद्द्यावरून आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.
ते म्हणाले, “खोके कुठे जातात? आणि कोण-कोठे गद्दारी करतो? हेही मला माहीत आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे. पण मला काम करायचं आहे. मला कामाने उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांनीही मला बोलायला भाग पाडू नये, एवढीच माझी इच्छा आहे” असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
शिंदे गटाच्या आमदारांवर गद्दारी केल्याच्या आरोपांबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी कोणी केली? बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो, त्यांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? आपल्याला मत देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कोणी केली? हे सर्व आम्ही बोलू शकतो. सध्या मी सज्जन भाषेत बोलत आहे. पण यावर मी नक्की बोलणार आहे, असे ही एकनाथ शिंदे म्हणाले. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.