शबनम न्युज | पुणे
“साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यापासून अनेक सत्कार, कौतुक झाले. मात्र, ज्या विद्यार्थी साहाय्यक समितीने मला घडवले. त्या मातृसंस्थेने आज केलेला सत्कार भारावणारा आहे. माझ्या सख्या, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाने पाठीवर टाकलेली ही कौतुकाची थाप ऊर्जा देणारी आहे,” अशी भावना साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या, प्रसिद्ध बालसाहित्यिका व कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. संगीता बर्वे यांचा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या माजी विद्यार्थिनी व लेखिका प्रार्थना सदावर्ते यांनी डॉ. बर्वे यांची मुलाखत घेतली.
समितीच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रा. तेज निवळीकर, डॉ. राजीव बर्वे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव सुनील चोरे, मनीषा गोसावी, अनिता देशपांडे, डॉ. मानसी अंबीकर, सुनंदा पाटील यांच्यासह कार्यकर्ते, माजी विद्यार्थी व समितीच्या वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, “ग्रामीण भागातून आल्याने परिस्थितीची जाण होती. वडिलांचे संस्कार होते. पुढे समितीत आल्यावर आयुष्याचा अर्थ उमगत गेला. सहज सुचलेले लिहीत गेले. गरिबीत जगणाऱ्यांसाठी डॉक्टरकी करू लागले. पण त्यातून जीवन समृद्ध झाले. आजच्या टेक्नोसॅव्ही जगात मुलांना समृद्ध बनविण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांना वेळ द्यायला हवा. त्यांना समजून घेतले पाहिजे. ‘पियूची वही’ ही प्रत्येकाच्या आयुष्याला जोडणारी आहे. लहानपणापासून खेळ खेळत असल्याने या प्रवासातील कसरत सहजपणे करता आली.”
Advertisement
भाऊसाहेब जाधव म्हणाले, “डॉ. संगीता बर्वे यांना मिळालेला पुरस्कार हा समितीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सहज, तरल व वास्तवदर्शी लेखनातून बर्वे यांनी मुलांचे बालपण, आई-बाबा यांच्यातील भावविश्व मांडले आहे. ‘पियूची वही’ ही संस्कार देणारी साहित्यकृती आहे. आपल्या प्रत्येकाच्या बालपणात डोकवायला लावणारे त्यांचे लेखन आहे.”
प्रास्ताविक प्रा. तेज निवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. पार्थना सदावर्ते यांनी केले. अनिता देशपांडे यांनी आभार मानले.