शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने ‘जस्टीस फॉर संजीव भट्ट ‘ या विषयावर सौ.श्वेता संजीव भट्ट यांचे व्याख्यान रविवार,दि १६ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ४ वाजता गांधीभवन(कोथरूड, पुणे) येथे आयोजित करण्यात आले होते. पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाला प्रतिसाद दिला.
फॅसिझमविरोधातील संघर्षात कारावास भोगणारे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचा संघर्ष समजावून घेण्यासाठी ‘फॅसिझम विरोधी जनआंदोलन’ या उपक्रमांतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
‘ संजीव भट्ट यांना अन्याय्य पद्धतीने गजाआड करण्यात आले आहे. त्यांना न्याय मिळविण्यासाठीचे आमचे प्रयत्न चालू राहतील.अन्यायाविरुद्धची ही लढाई इतिहासजमा होऊ द्यायची नाही ‘ , असा संदेश श्वेता भट्ट यांनी या व्याख्यानात दिला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संजीव भट्ट यांचे पुत्र शंतनू भट्ट,संयोजन समितीचे संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे,सचिन पांडुळे , कमलाकर शेटे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी म. गांधीजींची प्रतिमा देऊन श्वेता भट्ट यांचा सत्कार करण्यात आला.
श्वेता भट्ट म्हणाल्या, ‘२२ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात संजीव भट्ट यांना दोषी ठरवून जन्मठेप दिली गेली आणि ४ वर्ष ते तुरुंगात आहेत. जामनगर दंगल नियंत्रणात आणताना त्यांनी पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. २००२ च्या दंगलीत त्यांनी अहवाल बनवला होता. हा अहवाल सूडाचे कारण ठरले. आम्ही संवैधानिक मार्गाने लढत आहोत. कोणत्याही कोर्टात जामीन मिळत नाही.कोर्टात केस उभी राहत नाही. न्यायालयाची अशी हतबलता कधी पाहिली नव्हती.
आम्ही फक्त सत्याची लढाई लढत आहोत. संजीव भट्ट त्यांच्या अहवालाबाबत माघार घेत नाहीत, अन्यथा ते सुटले असते. आमचा लढा राजकीय शक्तींशी आहे. संजीव भट्ट यांच्या केसमध्ये निकाल देणाऱ्या न्यायाधीशाला पंधरा दिवसात बढती मिळाली. कोणत्याही केसमध्ये भट्ट यांचे नाव गोवले जात आहे. आता ही लढाई त्यांची एकटयाची राहिली नाही. आपण सर्वजण मिळून ही अन्यायाविरुद्ध ची लढाई लढली पाहिजे. काही जण स्वतःचे इतके फोटो काढतात, पण, संजीव भट्ट यांचा एकही फोटो माध्यमात येऊ देत नाहीत. पण, आपल्याला हा विषय इतिहासजमा होऊ द्यायचा नाही, असेही श्वेता भट्ट यांनी सांगीतले.
श्वेता भट्ट म्हणाल्या, ‘आम्हाला धमक्या येतात. राजकीय शक्तींनी कोणत्याही कारणाविना आमचे घर अर्धे तोडले आहे. आजवरची बचत खर्च करून, आमच्या मिळकती विकून ही न्यायालयीन लढाई लढली जात आहे.आम्हाला अपघात घडविण्याचा प्रयत्न झाला. पण, देशभरातून पाठिंबा देखील मिळत आहे. फोनवरून अनेक जण धीर देतात. लवकरच ‘ जस्टीस फॉर संजीव भट्ट ‘ हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. आणि या लढाईला व्यापक रुप देण्यात येणार आहे.
शंतनू भट्ट म्हणाले, ‘ सामूहिक प्रयत्नांनी, लढयानेच संजीव भट्ट यांना न्याय मिळू शकतो. एकटया दुकटयाच्या उभे राहण्याने न्याय मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे ‘.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘ दडपशाहीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याची गरज आहे.आत्मबलानेच हा लढा लढला पाहिजे. तो यशस्वी होईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही ‘.
संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले.
डॉ. प्रवीण सप्तर्षी, प्रशांत कोठाडिया, अॅड.संतोष म्हस्के, मिलिंद चंपानेरकर, श्रीकृष्ण बराटे सभागृहात उपस्थित होते.
न केलेल्या गुन्हयासाठी ४ वर्ष गजाआड : संजीव भट्ट प्रकरणाची पार्श्वभूमी
आय आय टी शिक्षण घेऊन आय पी एस झालेले अधिकारी संजीव भट अटकेला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सध्याची राजवट किती खुनशी आहे यासाठीचे हे उदाहरण पुरेसे आहे.जामीन देणे दूरच पण उलट नव्या गुन्ह्यात त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आला आहे.
5 सप्टेंबर 2018 रोजी सीआयडी क्राईम ब्रँचने सकाळी आठ वाजता घरात येऊन संजीव यांना प्रश्न विचारले व अटक करून घेऊन गेले. २३ वर्षांपूर्वी संजीव भट पोलीस उपअधीक्षक असताना त्यांनी एका पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी तुरुंगात असलेल्या एका कैद्याची सुटका झाल्यावर 12 दिवसाने त्याचा मृत्यू झाला .या कैद्याला संजीव भट यांनी बघितले ही नव्हते. त्या कैद्याच्या मृत्यूबाबत संजीव भट्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्याबद्दल २३ वर्षांनी अटक करण्यात आली . याबद्दल त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. या केसबद्दल कागदपत्रे त्या पोलीस स्टेशनला मागितली तर ते माहिती अधिकारात उपलब्ध नाही, असें उत्तर देतात .त्यामुळे अपील ही नीट होत नाही. न्यायालये,सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका सुनावणीलाच येत नाहीत. त्यावर अद्याप युक्तीवादच झालेला नाही. न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे, हे दिसून येते.