शबनम न्युज | मुंबई
सातत्याने भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष राज्यपालांची पाठराखण करत आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. राजकारण बाजूला ठेवून छत्रपती शिवरायांच्या मान-सन्मानासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. राज ठाकरे यांचेही भाषण ऐकले. त्याचेही मी स्वागत करते. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र लढले पाहिजे, अशी भूमिका माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.
महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरते आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आपल्या ज्येष्ठांनी जपली आहे. ती कुठेतरी ढासळताना दिसते. सुसंस्कृतपणा पुन्हा जपण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
शेतकरी केवळ राज्यात नव्हे तर देशात अडचणीत आहे. त्याला हमी भाव वेळेवर मिळत नाही. वास्तवतेपेक्षा दूर असणार हे सरकार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची आज वीज कापली जाते ते अतिशय चुकीचे आहे. मा. उपमुख्यमंत्र्यांनीच विरोधी पक्षनेते असातना विधान केले होते की, वीज तोडू नका तर मध्यप्रदेशाचे मॉडेल आणा. त्याप्रमाणे अंमलबजावणी त्यांनी करावी, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. पीक विम्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली पाहिजे. मी हा विषय पार्लामेंटच्या सेशनमध्ये मांडणार आहे, असे त्या म्हणाल्या.
वाचाळवीरांना आवर सत्तेत असलेल्या लोकांनी घालायला पाहिजे. मा. मुख्यमंत्री पदावर बसणारा व्यक्ती केवळ पक्षाचा नसतो तर राज्याचा असतो. याची नैतिक जबाबदारी मा. मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. सुसंस्कृतपणा दाखवून यातून मार्ग काढावा. महागाई आणि बेरोजगारी ही सर्वात मोठी आव्हान देशाच्या आणि राज्याच्या समोर आहेत. यावरही चर्चा झाली पाहिजे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.