शबनम न्यूज | पिंपरी
शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर बनवत असताना तसेच शहराचा सर्वांगीण विकास साधत असताना उद्योग आणि कामगारांची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असते. शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महापालिका आणि उद्योजकांनी योग्य समन्वय साधून कामगारांच्या हितासाठी काम केल्यास शहरात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
शहराचा सर्वांगीण विकास साधताना त्यात उद्योगांना सहभागी करून घेऊन शहरातील कामगारांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महापालिका अधिकारी आणि शहरातील उद्योजकांसमवेत समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी उद्योजकांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, एम.एम.सी.सी.आय.ए. चे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव, थरमॅक्स कंपनीच्या चेअरमन मेहेर पुदुमजी, दासराच्या सोनवी खन्ना, लीड सस्टेनेबिलीटी फोर्ब्स मार्शलच्या प्रीती किबे, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, बाबासाहेब गलबले, उपआयुक्त अजय चारठाणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील कामगारांची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने महापालिका आणि उद्योजकांनी प्रयत्न करणे अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक उपस्थित उद्योजकांनी यावेळी केले.