शबनम न्युज | पुणे
“भारतीय अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यात सनदी लेखापालांचे योगदान मोठे आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आर्थिक शिस्त लावत करदात्यांना आर्थिक साक्षर करण्यात सीएनी पुढाकार घ्यावा. सनदी लेखापालांनी चांगल्या आर्थिक व्यवस्थापनातून ‘एमएसएमई’ला उभारी देण्याचे काम करावे,” असे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) अभ्यास मंडळ (स्टुडंट्स स्किल्स एनरिचमेंट बोर्ड) आणि आयसीएआय पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘अग्निपंख’ या सीए विद्यार्थ्यांसाठीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले. कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या परिषदेत २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला.
प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, ‘डब्ल्यूआयआरसी’च्या ‘विकासा’चे चेअरमन सीए केतन सैय्या, ‘विभागीय समितीच्या सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, ‘विकासा पुणे’ चेअरपर्सन सीए मौसमी शहा, ‘विकासा सातारा’ चेअरमन सीए ऋषिकेश वांगडे, विकासा व्हाईस चेअरमन आशिष पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात ‘आयसीएआय पुणे’चे उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सचिव सीए प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे, सदस्य सीए सचिन मिनियार, सीए अमृता कुलकर्णी, सीए ऋषिकेश बडवे, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.
मिलिंद कांबळे म्हणाले, “सनदी लेखापाल होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देणारी ही परिषद आहे. जीवनात येणाऱ्या आव्हानांना संधींमध्ये रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करावे. आपण सर्व भविष्यातील अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे करदात्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करावे. उद्योजकांना आर्थिक साक्षर बनवावे. औद्योगिक व शिक्षण क्षेत्राने एकत्रित काम केले, तर मोठे बदल घडतील. भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जगाच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था लवकर सावरत आहे.”
सीए केतन सैय्या म्हणाले, “कठोर परिश्रम, सुदृढ आरोग्य, मानवता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी अंगिकाराव्यात. जीवनात यश-अपयश येते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता त्यातून वाट काढत ध्येयपूर्तीकडे जावे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. समाजाच्या, देशाच्या विकासासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून आपण काम करावे. त्या अनुषंगाने या परिषदेमध्ये दोन दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.”
सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे यांनीही मार्गदर्शन केले. सीए काशिनाथ पठारे यांनी प्रास्ताविकात ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ९५०० सीए सभासद व २० हजार पेक्षा अधिक सीए विद्यार्थी संस्थेशी संलग्न असल्याचे ते म्हणाले. सीए आशिष पाटील यांनी आभार मानले.