‘हम दो हमारे दो…’ या संकल्पनेची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन
शबनम न्युज | बारामती
विविध क्षेत्रात मुली या अग्रेसर होत चालल्या आहेत. मुली मुलांपेक्षा कमी नाही, म्हणून कुटूंबांनी मुलाचा आग्रह टाळण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले आहे. ते बारामतीत आयोजित मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात गरजू महिलांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी दोन अपत्यांच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन ही अजित पवारांनी केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले,”कटुंबानी दोन अपत्यांवरच समाधान बाळगायला हवे, आणि त्यात दोन्ही जर मुली झाल्या तरीही एवढे लक्षात ठेवावे कि, मुली या मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, म्हणून कुटुंबांनी मुलाचा आग्रह टाळायला हवा,” असे अजित पवार म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंचे उदाहरण देत तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा (काका) असा उल्लेख करत ते म्हणाले, ” काकांकडे बघा, सुप्रिया सुळे या त्यांच्या एकच मूल आहे आणि त्यांनीही कुटुंबाचे नाव कमावले आहेत. मुलांच्या तुलनेत मुली कमी नसताना लोकांना मुलाची गरज का आहे? असा प्रश्न देखील यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला.
तसेच बारामती शहरात वाढलेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामतीत कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही, मी या ‘कोयता फोयता’ टोळीबद्दल ऐकले आहे. मला खात्री आहे की पोलिस त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना बारामतीतून हद्दपार करतील. बारामतीतील कोणत्याही गुंडगिरीला मी खपवून घेणार नाही,” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.