समाधी वारसा जपण्यासाठी पुणेकरांना आवाहन
शबनम न्युज | पुणे
ओंकारेश्वर मंदिरामागे भिंती जवळ नदीपात्रात असलेली कै.गंगाधर केळकर यांच्या समाधीला, समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेल्या १९२८ सालच्या समाधीला महादेव मंदिरात रूपांतरित करून मूळ रूप आणि भावना बदलू नये असे आवाहन केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांना केले आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या जागी उत्सवाची रंगरंगोटी कामे सुरु झाली आहेत ,तसे फलक लागले आहेत. हे फलक पाहून गंगाधर केळकर यांचे नातू नेत्ररोगतज्ज्ञ डॉ श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी आज या समाधीला भेट देऊन पाहणी केली. तेथे येणाऱ्या भाविकांना समाधीबद्दल माहिती दिली. यावेळी केळकर कुटुंबातील डॉ श्रीकांत केळकर,अरुणा श्रीकांत केळकर,सत्यजित केळकर आणि सुधन्वा रानडे हे उपस्थित होते.
समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेली ही रचना केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळेसच समाधीवर कलात्मकरीत्या पिंड(शिवलींग) बसवलेले आहे. वर्षानुवर्षे हे शिवलिंग पाहून भाविक या समाधी संरचनेला महादेवाचे मंदिर समजू लागले आहेत.तेथे दगडी नंदीही आणण्यात आला आहे. शिवलिंगावर अभिषेक करायला जाता यावे म्हणून लोखंडी सांगाडा बसविण्यात येऊन येण्याजाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे समाधीच्या मूळ कलात्मक स्वरूपाला ओबड धोबड कळा आली आहे.
महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरु झाल्याचे फलक लावण्यात आले होते. समाधीचे रूपांतर मंदिरात केले जाऊ नये आणि भाविकांची भावनात्मक फसगत होऊ नये,म्हणून केळकर कुटुंबीयांनी आज समाधीजवळ आलेल्या भाविकांची भेट घेऊन समाधीचा इतिहास सांगितला. पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते .समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही त्यांनी यावेळी दाखवली.
नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले .