शबनम न्युज | मुंबई
“राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ” अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचे सांगत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्याची परिस्थिती काय, उत्पन्न किती येणार, खर्च किती आहे याऐवजी ज्या घोषणा करण्यात आल्या त्या पाहिल्यास आणि आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यास कुठेही राज्याला जास्त पैसे मिळतील अशी परिस्थिती नाही, असा शेरा अजित पवार यांनी मारला.
संत तुकाराम महाराजांच्या देहू परिसरासाठी भरीव मदत जाहीर झाली नाही, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्याचे काम झाले, परंते महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले तरी त्यावर बजेटमध्ये कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या कानाला बरे वाटावे अशा गोष्टी या सरकारच्या काळात झाल्या आहेत. याच गोष्टींची पुनरावृत्ती अर्थसंकल्पात झाली असल्याची टीका अजित पवार यांनी केली.
मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री आम्ही मांडली होती. या सरकारने पंचामृत आणले. मुळात अमृत कोणीही बघितलेले नाही, तसेच हे विकासाचे पंचामृत आहे, जे कधीच दिसणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. २०१४ पासून आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? राज्यातील उद्योग बाहेर जात आहे ते थांबवण्यासाठी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या पंचसूत्रीतील बऱ्याच बाबींची पुनरावृत्ती झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतपंपांच्या वीजमाफीची घोषणा यापूर्वी हे लोक सत्तेत असताना केली गेली होती, पण त्यांनी या अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही केला नाही असे सांगत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पस्तीस टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ करून मोठा झटका देण्यात येणार आहे, अशी चर्चा सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या कांदा, द्राक्ष, कापूस, हरभरा, आंबा अशा सर्व शेतमालाला चांगल्याप्रकारचे दर द्यावे अशी मागणी त्यांनी केली. हे सरकार केवळ भरीव तरतूद करणार असे आश्वासन देत आहे, पण अर्थसंकल्पात फक्त स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ पाहायला मिळाला आहे, असे अजित पवार म्हणाले.