‘त्या बातम्यांमध्ये कोणतीही तथ्य नाही,’… अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे!
मुंबई | शबनम न्यूज
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध बातम्या झळकत होत्या. या सर्व बातम्यांवर खुद्द अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत मी राष्ट्रवादीत राहणार असल्याचे स्पष्ट केले. आज अजित पवार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांबाबत चर्चा केली.
“कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
अजित पवार म्हणाले की, “आपण सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवत आहात त्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही. माझ्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचे दाखवले परंतु अशा सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत त्यामुळे या बातम्यांना कुठलाही आधार नाही” असं त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ‘पक्षाच्या बाहेरचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे झाले आहेत त्यांना कुणी अधिकार दिला आहे कुणास ठाऊक… हे जेव्हा मविआची बैठक होईल तेव्हा विचारणार आहे असे स्पष्ट करतानाच तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात तर त्या पक्षाचे सांगा तुमच्या पक्षाचे मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचे वकीलपत्र दुसऱ्यांनी घेण्याची गरज नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आमची भूमिका मांडण्याकरता आमच्या पक्षाचा प्रवक्ता आणि नेते मजबूत आहेत,’ अशा शब्दात अजित पवार यांनी संजय राऊतांना देखील फटकारलं.
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे…
1. कारण नसताना माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरु आहे.
2. भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत.
3. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत मात्र मी त्याबाबत बोलणार नाही.
4. प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका.
5. आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका कारण संभ्रम निर्माण होतं आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षात चढउतार आले आहेत. आम्ही तिथच राहणार आहोत.
6. सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे.
7. जिवात जीव असेपर्यंत पक्षासोबत कायम राहाणार, पक्षाचं काम करणार. चर्चा थांबवा, तुकडा पाडा.
8. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटना ही सरकारनिर्मित आपत्ती, माणसाच्या जीवाशी हे का खेळले याचं उत्तर द्यावं.
9. राजभवनला हॉलमध्ये हा सोहळा घेता आला असता मात्र यांनी निष्काळजीपणा नडला आहे.
10. राजकारण्यांना राजकारण साधायचं होत का? सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवली नाही