आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी मुंबईत ४०० किमी रस्त्यांच्या विकासकामांची घोषणा केली होती. मात्र, ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
“रस्त्यांची कामं ३१ मे पर्यंत प्रगतीपथावर असणं गरजेचं आहे. परंतु, कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. यासंदर्भात भाजपाच्या माजी नगरसेवकाचं पत्र ही पालिकेला आले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ माजी नगरसेवक आहेत. त्यांनीच हे पत्र पालिकेला पाठवले असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांच्या वॉर्डात रस्त्यांची कामं सुरू झाली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कोणत्याच माजी नगरसेवकाच्या वॉर्डात कामं सुरू झाली नसल्याचंही आदित्य ठाकरे यांनी पुढे स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले, “४०० किमीचे रस्त्यांचा विकास करण्याचं या सरकारने ठरवलं. पण ३१ मे पर्यंत किती टक्के काम पूर्ण होणार आहे, याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. पाच कंपन्यांना पाच कंत्राट मिळाले, पण या पाच कंपन्या कोणत्या हे कोणालाच माहिती नाही. परंतु, कोणतेही लोकप्रतिनिधी पालिकेत नसताना पाच कंत्राट दिले जातात. पैसे वाढवून कंत्राट दिले गेले. यामुळे ४८ टक्के जास्त बिडिंग झालं आहे. १८ जानेवारीमध्ये घाईघाईत वर्क ऑर्डर दिली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना संपला. आता एप्रिल सुरू झाला आहे. परंतु, कामं सुरू झाली नाहीत. या पाच कंपन्यांची कामं कुठेच दिसत नाहीतठ, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी पाच प्रश्न सरकारला विचारले. “प्रस्तावित असलेली कामं सुरू कधी होणार?, कामं सुरू झाली असतील तर कुठे सुरू झाली?, एक्स्कॉलशनचा क्लॉज टाकला आहे का?, एस्केलशनचा क्लॉज बीएमसीने त्यात टाकला आहे का?, वर्क ऑर्डर अॅट पार कि बिलिंग नियमानुसार आहे?, सबलेट्सचा क्लॉज मशिनीद्वारे आहे का?, सहा हजार ८० कोटींच्या टेंडरला १० टक्के मोबलायजेशन आहे, हे ६५० कोटी बिल्डर्सच्या घशात टाकण्याचा प्रयत्न आहे का?” असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी यावेळी पुन्हा उपस्थित केले.