शबनम न्युज | मुंबई
राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात सहाव्या जागेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला.
या विजयानंतर धनंजय महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या विजयाचे फक्त आणि फक्त शिल्पकार कोण असतील ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे भाजपची संपूर्ण टीम आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ,आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड ,प्रवीण दरेकर यांनी कठोर परिश्रम घेतले. आमच्यासाठी निवडणूक खूपच मोठी आहे. ज्या दिवशी मी अर्ज भरला त्या वेळीसुद्धा मी म्हणालो होतो, फडणवीस यांनी संख्याबळाची बेरीज असल्याशिवाय तिसरा उमेदवार जाहीर केला नसता. आम्ही अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही सांगितले होते भाजपचे उमेदवार निवडून येतील, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीकडून अनेकवेळा संख्याबळ सांगण्यात आले, त्यामुळे चारही उमेदवार निवडून यायला हवे होते. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली त्यामुळे भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला असून हा ऐतिहासिक विजय आहे. ही लढाई भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची होती,असे म्हणत धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवावर कोणतेही भाष्य केले नाही. संजय पवार आपले मित्र असल्याची भावना धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
कुणाचे किती उमेदवार विजयी?
भाजप – 3
शिवसेना – 1
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी काँग्रेस – 1
पहिल्या पसंतीची कुणाला किती मते?
प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
संजय राऊत, शिवसेना – 41
पियुष गोयल, भाजप – 48
अनिल बोंडे, भाजप – 48
सहाव्या जागेवर कोणत्या उमेदवाराची बाजी?
धनंजय महाडिक, भाजप – 41
संजय पवार, शिवसेना – 33