सत्य लिहिले आहे आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो – राऊत
शबनम न्यूज : वृत्तसंस्था
“सामनाच्या अग्रलेखातून काहीही चुकीचे लिहिलेले नाही. विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु नाहीत का? सत्य लिहिले आहे आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो. अजितदादांनी सांगावे, असे घडत नाही का? काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता,” अशी विचारणा खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षाला सोडचिठ्ठी देणार, आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर झाल्या. मात्र, खुद्द अजित पवार यांनी या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण देत आपण राष्ट्रवादीच राहणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले होते कि, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले, हे इतरांनी कुणी सांगू नये. तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात का, आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेले नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावे,” असे भाष्य अजित पवारांनी केले,
दरम्यान, त्यांच्या या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर देत सवाल केला आहे. ते म्हणाले, सामनाच्या अग्रलेखातून काहीही चुकीचे लिहिलेले नाही. विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु नाहीत का? सत्य लिहिले आहे आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो. अजितदादांनी सांगावे, असे घडत नाही का? खरे बोलल्यामुळे मला कुणी टार्गेट केले आणि त्यामुळे मी मागे हटेन, असे वाटत असेल तर तसे नाही. मी नेहमीच खरे बोलतो. कुणाच्या बापाला घाबरत नाही. सामनात नेहमीच सत्य लिहिले जाते. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. पवार कुटुंबियांवर दबाव आहे. त्यासोबत राष्ट्रावादी काँग्रेसमधील हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांवरही दबाव आहे. ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून भाजप ऑपरेशन करते. यावर आम्ही बोललो तर भाजपला राग यायला हवा. इतर कुणाला राग यायचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे