शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. तसेच भाजपाचा पराभव केला आहे. विरोधी पक्षांकडून याच निकालाची देशभर पुनरावृत्ती होईल, असे प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “कर्नाटकची जनता, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता, पदाधिकारी, नेते आणि कर्नाटकमध्ये काम केलेल्या काँग्रेसच्या देशातील इतर नेत्यांचं मी अभिनंदन करतो”, असं राहुल गांधी म्हणाले.
तसेच “कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. गरीबांच्या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीला हरवलं. हेच प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरीबांबरोबर उभा राहिला. आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो”, असं राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं. मला सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की आम्ही द्वेषाने, चुकीच्या शब्दांनी ही लढाई नाही लढली. आम्ही प्रेमाने ही लढाई लढलो. कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला हे दाखवलं की प्रेम या देशाला हवंसं वाटतंय. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.