शबनम न्यूज | अहमदनगर
विखेंनी दहा वर्ष कारखाना स्वतःकडे ठेवूनही सुरू केला नाही. आता गणेश साखर कारखान्यावर एकाच दिवशी बैठकीची नोटीस देण्यात आली, त्याच दिवशी बैठक आणि लगेच करार वाढवून घेतला घेण्यात आला, असा आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर केला आहे.
थोरात म्हणाले, “निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा आग्रह असल्यामुळे मीही त्यात थोडा सहभाग घेत आहे. हा कारखाना १० वर्षे राधाकृष्ण विखेंच्या ताब्यात होता. परंतू त्यानंतरही कारखान्यात काहीही प्रगती झाली नाही. १० वर्षांनंतरही कारखाना सुरू झाला नाही. काही तरी गाळप करायचं आणि त्यानंतर थांबायचं हाच प्रयत्न सातत्याने झाला.”
“आता आणखी वर्षे वाढवून घेईन हे काय करणार आहेत. त्यांना कारखाना बंदच ठेवायचा आहे का अशी शंका येणं साहजिक आहे. निवडणूक थांबलेली नाही. कारखान्याचे सभासद निर्णय देतील आणि ते संचालक मंडळ तिथे येईल. निवडणुकीनंतर वज्रमुठचंच संचालक मंडळ येईल, याची मला खात्री आहे,” असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.