शबनम न्युज | पुणे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज शिरूर मतदारसंघातल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.या बैठकीत खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील कामगिरीची चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हेंनी सूचक प्रतिक्रिया दिली. “मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल मला भीती वाटते. तयारी तशीही सुरूच आहे. माणूस महत्त्वाचा नाही, पक्ष महत्त्वाचा आहे. अंतिमत: पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल”, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
“जनसंपर्काच्या बाबतीतलं कार्यकर्त्यांचं महत्त्व त्यांनी समजून घेतलं. त्यानुसार पुढील काळात काम करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. अंतिम निर्णय पक्ष ठरवेल. शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण. त्यामुळे इतर कुणीही अकारण चर्चा करू नयेत. कलाक्षेत्रात मी काम करत असतो. यात राजकीय भूमिका सोडून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे त्यातून अकारण कुठलेही अर्थ काढू नयेत, अशी माझी विनंती आहे”, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
२०१९ साली मी इथली निवडणूक ३ मुद्द्यांवर लढवली होती. बैलगाडा शर्यती, पुणे-नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि पुणे-नाशिक रेल्वे या तीन मुद्द्यांचा समावेश आहे. चार वर्षांत बैलगाडा शर्यत आणि पुणे नाशिक महामार्गावरची कोंडी हे दोन प्रश्न सुटले आहेत. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प भूसंपादन आणि कॅबिनेटच्या मंजुरीपर्यंत पोहोचला आहे. हा आढावा शरद पवारांसमोर मांडला”, असं अमोल कोल्हे म्हणाले.