पिंपरी, पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानतेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ओळखला जातो. स्वराज्याचे स्फुल्लिंग मासाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणेने रुजले. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करून “जिजाऊ नगर” करण्यासाठी राज्यभर जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांनी व्यक्त केला आहे. या जन आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांचा देखील सहभाग वाढवा यासाठी लवकरच हेल्पलाइन नंबर जाहीर करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले आहे.
भक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, स्वराज्य हा एक विचार होता. या विचाराला मूर्त रूप देणारे छत्रपती शिवराय जरी असले, तरी त्या विचाराचे बीज जिच्या मनात अंकुरले होते त्या होत्या माँ साहेब जिजाऊ. हे स्वप्न त्यांनी प्रथम पाहिले. ज्या पावन भूमीत हे स्वप्न त्यांनी पाहिलं, जिथे त्यांनी ते रुजवलं तो हाच परिसर. मावळ – मुळशी पट्ट्यात स्वराज्याच्या गाथेचे धगधगते अध्याय लिहिले गेले त्याच्या पाऊलखुणा आजही अस्तित्वात आहेत. जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवबांनी हे स्वराज्य वाढवले आणि मावळ्यांनी ते प्राण पणाने जपले हा दैदिप्यमान आणि तेजस्वी इतिहास आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवड परिसर आक्रमकांचे नाव मिळण्यापासून वाचले. साडेतीनशे वर्षांपासून आपण स्वाभिमानाने आपली ओळख टिकवू शकलो यामागे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष माँ साहेब जिजाऊ आहेत.
पण आपण एक प्रश्न आपल्याला विचारुया की त्या माँ साहेब जिजाऊंना आपण काय दिले? शिवरायांच्या महानतेने संपूर्ण महाराष्ट्र ओळखला जातो. पण त्या शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊंच्या नावाने महाराष्ट्रात आज एकही शहर नाही.
आपण आपल्याला जिजाऊंची लेकरे मानतो. जिजाऊंनी शिवबाला दिलेला स्वाभिमानी बाणा पुरा मावळ पट्टा उराशी बाळगतो. मागील काही दशकांत पिंपरी चिंचवडने याच स्वाभिमानाच्या ताकदीवर बदलत्या काळानुरूप आपली नवीन औद्योगिक ओळख निर्माण केली. पण आईकडून सतत घेणाऱ्या मुलांनी आयुष्यात एकदा तरी आईला काही तरी द्यायला सुद्धा शिकले पाहिजे. माँ साहेब जिजाऊंच्या ऋणातून आपण कधीच उतराई होवू शकत नाहीत.
परंतु त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून पिंपरी चिंचवड सारख्या भारतातील औद्योगिक विकासात अग्रणी असणाऱ्या शहराला जिजाऊंचे नाव देवून जिजाऊंचा यथोचित सन्मान करायलाच हवा. आपण जिजाऊंचे आणि शिवबाचे मावळे आता गप्प बसून चालणार नाही. सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने आपण या लढ्यात सामील होवू आणि ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनी हा संकल्प करू व तो ३५१ व्या शिवराज्याभषेक दिनापर्यंत पूर्ण करून मासाहेब जिजाऊ यांचा सन्मान करू या. यासाठी भक्ति – शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या जनआंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महेश हिरामण बारणे यांनी केले आहे