शबनम न्युज | मुंबई
आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “अजित पवारांचा स्वभाव मला माहित आहे, बाकीच्यांची सत्तेसाठी डावपेच सुरु असली तरी त्यांच्यामुळे लोकांना वेळेवर मदत मिळेल, कारण त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा दिल्या गेल्या आहेत,” असा विश्वास यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, ज्या अजित पवारांमुळे शिवसेनेचा एक गट गुवाहाटीला गेला, आता तेच अजित पवार सत्तेत आले आहेत. मग खरं कोण आणि खोटं कोण? या प्रश्नावर हे समजायला जनता मूर्ख नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मी असे किळसवाणे आणि बिभस्त व्हिडिओ पाहत नाही. परंतु काल राज्यातील महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.