शबनम न्युज | मुंबई
आज पावसाळी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आजही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मणिपूरमधील घटनेवरुन केंद्र सरकारचा निषेध केला आहे. ‘उलट्या काळजाच्या आणि थंड रक्त असलेल्या केंद्र सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा यावेळी विरोधकांच्या वतीने देण्यात आल्या.
देशात मणिपूरमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनेवरून वातावरण तापलं आहे. त्याचे राज्यातही पडसाद उपटताना दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ देशात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर विरोधकांनी मणिपूरमधील घटनेवरुन केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन केले. तसेच अधिवेशनात ही या घटनेच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला, मात्र मणिपूरमधील हिंसाचार आणि दोन महिलांवरील बलात्कार प्रकरणाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे वेळ मागितला. परंतु, तशी संधी न मिळाल्याने विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
तसेच यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तिथे दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितली. परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. मणिपूरच्या घटनेचा देशभरातील लोक निषेध करत आहेत. आम्हाला वाटतं की, विधीमंडळाच्या माध्यमातून याबाबत एक ठराव झाला पाहिजे. त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. यासंदर्भात ठराव व्हावा, अशी भावना आम्ही व्यक्त केली. परंतु आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही. विधानसभा अध्यक्षांनी पाच मिनिटंसुद्धा आम्हाला दिली नाहीत.” असे त्यांनी सांगितले.