मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु झालंय का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. दिवसभर याबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यावर आता अजित पवार यांनीच याविषयी खुलासा केला आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. याबाबत तुम्हाला काय त्रास आहे? असा प्रश्न आता अजित पवार यांनी विचारला आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी १५ दिवसांनी आढावा बैठक घ्यायचो आणि गती द्यायचं काम आम्ही करतो. आत्ताही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतो आहे. देवेंद्र फडणवीस आमच्यासह आहेत, इतर सहकारीही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असतात.
राधेश्याम मोपलवार यांच्याकडे या समितीची जबाबदारी आहे. आम्ही सरकार मध्ये जाण्याचं कारणच हे होतं की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. हे सगळं करत असताना देशपातळीवर आम्ही मोदींना पाठिंबाही दिलेला आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.