सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार
देशात मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं चित्रपटाने पुन्हा एकदा बाजी मारत आपल्या शिरपेचात राष्ट्रीय पुरस्काराचा तुरा प्राप्त केला आहे. आज ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. त्यावेळी सर्व देशातील सर्व भाषांतील पुरस्कारप्राप्त चित्रपटांची घोषणा करण्यात आली.
घरातल्या चौकोनी कुटूंबात, एकमेकांशी असलेलं हळवं नातं, एकमेकांसोबत मिळणारे अनमोल क्षण, भावनांचे अर्थ आणि प्रेमानं जुळणारी मनं अशा कौटुंबिक पार्श्वभूमीवरील हा चित्रपट डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे. वडिल-मुलाच्या, आजी-नातवाच्या, आई-मुलाच्या नात्यांवर पुन्हा एकदा नव्याने प्रकाश पाडणारी कथा म्हणून या चित्रपटाकडे बघितलं गेलं. अशातच सुमीत राघवन, मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री यांचा दर्जेदार अभिनय आणि अर्जुन पुर्णपात्रे या बालकलाकाराने पदार्पणातच केलेली कमाल ‘एकदा काय झालं!!’च्या निमित्ताने बघायला मिळाली. गोष्टी सांगणाऱ्या माणसाचं विश्व डॉ. सलील यांच्या लेखणीतून साकारलं आहे, त्याला संदीप खरेंच्या गीतांची जोड मिळाली… तर शंकर महादेवन आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजाने या चित्रपटातील गाण्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. सर्व बाजूंनी दमदार असलेल्या ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत ‘एकदा काय झालं!!’ची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दात्ये, अनूप निमकर, नितीन प्रकाश वैद्य, डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सौमेंदु कुबेर आणि रायरा कॉर्पोरेशनचे सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे. गोष्ट सांगणाऱ्या माणसाची ही गोष्ट आता भारतभर पोहोचली असे म्हणल्यास हरकत नाही!