शबनम न्युज | अहमदनगर
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेने सुरू केलेले उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, 21 सप्टेंबरला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार आणि सर्व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांची मुंबईत बैठक झाली. राज्य सरकारने त्यांच्या मागणीला न्याय म्हणत एकमताने पाठिंबा दिला. या आरक्षणासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. काही गोष्टी न्यायप्रविष्ठ आहेत. त्या गोष्टी सोडवण्यासाठी शासन अतिशय गंभीर आणि कटिबद्ध आहे आवश्यकता भासल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांचे अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक करण्यात येईल, यासाठी शासन आपली पुढील कार्यवाही करेल, या तांत्रिक गोष्टी पुढील 50 दिवसात पार पाडल्या जातील. आजच्या बैठकीत दोन महिने सांगितले होते, मात्र उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की, त्या बैठकीला आठ दिवस होऊन गेले. त्यामुळे पुढील 50 दिवसांमध्ये ही कार्यवाही पूर्ण करावी, जेणेकरून या आरक्षणातील अडचणी दूर होतील.