गांधीसप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात मंथन
‘ बहुसंख्यांक वर्चस्ववादातून अराजकाचा धोका ‘
पुणे: ‘ बहुसंख्यांक वर्चस्ववादातून अराजकाचा धोका आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे ‘, असा सूर ‘लोकसभा निवडणूक २०२४: आव्हाने आणि पर्याय ‘ या परिसंवादात उमटला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमीत्त ‘ लोकसभा निवडणुक: आव्हाने आणि पर्याय’ या विषयावरील परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. गांधी भवन, कोथरूड येथे ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा परिसंवाद झाला.
जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, विजय चोरमारे आणि अभिनेते किरण माने हे या परिसंवादात सहभागी झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे या परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानी होते.
विजय चोरमारे म्हणाले,’ येणाऱ्या लोकसभा निवडणुका हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे.स्वायत्त घटनात्मक संस्था, निष्पक्ष प्रसार माध्यमे असतील तर ही निवडणूक विरोधकांना जिंकता येईल. काँग्रेसने विरोधक उध्वस्त करून संपविण्याचा उद्योग केला नव्हता. पण आता तो होतो आहे.
सरकारी यंत्रणा तील एकही अधिकारी या गैर वापर पाहून राजीनामा देत नाही, इतकी दहशत निर्माण झाली आहे.
वाहिन्या,माध्यमे सत्ताधाऱ्यांना पूरक भूमिका घेतात. हेडलाईन मॅनेजमेंट केली जाते. ही बिघडलेली परिस्थिती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुरुस्त होईल, रोगाला पर्याय न शोधता, इलाज शोधला जाईल, याचा मला विश्वास आहे, असेही चोरमारे यांनी सांगीतले
किरण माने म्हणाले, निवडणुकीत मतदार तोलले जावू नयेत. आज लोकशाही आहे की नाही, असा प्रश्न पडतो. सत्ता हे एकमेव ध्येय झाले आहे. विचारधारा गुंडाळून ठेवली जात आहेत. आज दमन आणि प्रलोभन याचा धोका आहे. येत्या निवडणुकीत आपण भानावर येवू असे मला वाटते. विद्वेषावरील चित्रपट तयार करण्यासाठी शेकडो कोटी रुपये दिले जातात. तिकिटे फुकट वाटली जातात. शिवाजी महाराजांची लोकहितकारी भूमिका एकाही चित्रपटात दाखवले जात नाही. स्पष्ट बोलणाऱ्या अभिनेत्यांना चित्रपटातील भूमिका नाकारल्या जातात.रोजच्या जगण्यात विष कालवले जाते आहे, हे थांबवले पाहिजे.
श्रीराम पवार म्हणाले, ‘आव्हाने फक्त लोकशाही पुढे नाही तर ते व्यवस्थेपुढे आहे. घटनेला वाकवून बहुमतशाही राबवली जात आहे. कोणीही निवडून आले तरी मागील दहा वर्षात झालेले बदल पुसणे अवघड होणार आहे. लोकसभा निवडणुका एकतर्फी होणार नाहीत, असे आता तरी वाटते आहे. निवडणुका होतील पण सत्ता सोडली जाईल, असे वाटत नाही.बहुसंख्यांक वादी राजकारणात कोणाला तरी खलनायक केलें होते.गांधीजींच्या काळचा भारत आता बदलत गेला आहे. धर्मनिरपेक्षतावाद, सेक्युलर विचाराची खिल्ली उडविण्यात बहुसंख्यवादाला यश आले आहे.सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जात नाहीत.विचारले तर बेदखल केले जाते आहे.विद्वेषाला विद्वेषाने उत्तर दिले तर अराजक तयार होण्याचा धोका आहे ‘, असेही श्रीराम पवार यांनी सांगीतले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ दंगल आपोआप घडत नाही, ती घडवले जाते. सत्तेकरिता हिंसा घडवून आणली जात आहे. हा धर्म नसून अधर्म आहे. नरेंद्र मोदींना पराभूत करण्यास आधीच उशीर झाला आहे. भारत हा हजारो वर्ष एकत्र राहणारा देश असून येथे विभाजनवादी, विद्वेषवादी नेत्याला, पक्षाला थारा देता कामा नये’.
संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. अन्वर राजन,जांबुवंत मनोहर, प्रशांत कोठडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
Advertisement