शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी दर्शन शिबिरास रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.गांधीभवन,कोथरूड येथे सकाळी १० ते ६ या वेळेत हे शिबीर झाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.सत्यरंजन धर्माधिकारी,डॉ कुमार सप्तर्षी,डॉ.शैलजा बरूरे सहभागी झाले. प्रा. एम. एस. जाधव, संदिप बर्वे, सचिन पांडुळे डॉ. प्रवीण सप्तर्षी, नीलम पंडित, सुदर्शन चखाले उपस्थित होते.
न्या. धर्माधिकारी म्हणाले, ‘ शासन व्यवस्थेत गांधीजींचा सन्मान केला जातो, पण, त्यांचा प्रभाव दैनंदिन कामकाजावर पडणार नाहीत, असे पाहिले जाते. गांधी यांच्या मार्गाने शासन व्यवस्थेचे, न्यायव्यवस्थेचे आचरण का चालत नाही ?
‘संविधानात न्यायाची हमी दिलेली आहे. न्याय मागण्याचा अधिकार हा मूलभूत व्यवस्था आहे. पण, तिथपर्यंत पोहोचणे अवघड, खर्चिक आहे. न्यायव्यवस्थेचे भारतियीकरण झाले पाहिजे, असे बोलले जाते. मात्र, ते प्रत्यक्षात होत नाही, असेही ते म्हणाले.
‘गांधींच्या विचारांशिवाय न्याय व्यवस्था असू शकत नाही. त्यांचे विचार दार्शनिक होते. न्याय व्यवस्थेने लोकांचे समाधान केले पाहिजे, असे विनोबा भावे म्हणत. न्याय व्यवस्थेची भाषा, पोशाख स्वदेशी असली पाहिजे. पण ते अजून झाले नाही. न्याय व्यवस्थेतील सर्वांनी विश्वस्त भावनेने वावरले पाहिजे, त्यांनी वैश्विक भावनेने वावरले पाहिजे. गांधीजींच्या सिद्धांताचा अंगीकार केला पाहिजे. फक्त कायद्यांची नावे बदलून भारतियिकरण होणार नाही. ‘मेकॉले ते महात्मा ‘ असा न्यायव्यवस्थेचा प्रवास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही न्या. धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.