शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी करत महायुतीमध्ये जाण्याचे निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासाठी आता निवडणूक आयोगामध्ये पुढे लढाई सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होऊन आज 100 दिवस झाले आहेत. त्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र संवादाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.
संवाद पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले-शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे लोक कल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जुलै 2023 रोजी महायुती सरकार मध्ये सामील झाला.
प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हान ही वेगळी असतात. त्या त्या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते, आपण लोकांचे देणे लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. या भूमिकेवर माझा आणि माझ्या सहकार्याचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
पुढे त्यांनी लिहिले कि, टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे, असे मी मानतो. सकारात्मक टीकेचे मी नेहमीच दखल घेतो, मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक, विश्वासात्मक ,राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे .हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे , कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे आणि यावर माझा विश्वास आहे, असेही अजित पवार यांनी संवाद पत्रात नमूद केले आहे.