शबनम न्युज | यवतमाळ (वृत्तसंस्था )
भारतीय राज्यघटनेमध्ये लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिखित आहेत. या राज्यघटनेनुसारच लोकसेवेचे काम सुरु असून यापुढेही ते सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी आणि सावंगा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, लाख, तुपटाकळी आणि सावंगा ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, राज्यघटनेचे शिल्पकार डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लोकप्रतिनिधींचे कर्तव्य, जबाबदाऱ्या समाविष्ट केल्या आहेत. या घटनेनुसारच कृती आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीधर्म, गरीब-श्रीमंत न पाहता सर्वसामान्य, शेतकरी हिताची कामे केली जात आहे. गोरगरीब, शेतकरी, महिलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. लोकहिताची कामे ही बोलण्यापेक्षा करुन दाखवण्यावर माझा विश्वास आहे. लोकांचे ऋण फेडण्याच्या भूमिकेतून काम करीत आहे. यापूर्वीही अनेक विकासाची कामे केली असून यापुढेही सार्वजनिक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.