शबनम न्युज | मुंबई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल देताना एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार पात्र ठरवले आहेत तसेच शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना, राहुल नार्वेकरांवर मोठी टीका केली असून, त्यांनी दिलेला निकाल हा लोकशाहीची निर्लज्ज हत्या असल्याचे सांगितले आहे.
आगामी काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान भाजपला मान्य नाही, त्यांना स्वतःचा संविधान लिहायचा आहे हे स्पष्ट होईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
राहुल नार्वेकर जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा ते कोणत्या पक्षप्रमुखाचे आदेश मान्य करत होते, असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी नार्वेकरांना केला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये जनताच न्याय करेल, संपूर्ण जगाला या प्रकरणातून कळले आहे की, लोकशाही आपल्या देशात मारली गेली आहे असे आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.