शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी । प्रतिनिधी : शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणातील भव्य मंडपात ४००हून अधिक लहान मुलांच्या उपस्थितीत चित्रकार चारुहास पंडित यांनी ‘चिंटू’चे चित्र काढले आणि लहान मुलांच्या टाळ्यांच्या कडकडाटात एकच भावना तयार झाली की, “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा”! या प्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल उपस्थित होते.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात झालेल्या लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी या वयोगटासाठी ‘गणेशोत्सव’ आणि ‘आवडता प्राणी’ तसेच इयत्ता पाचवी ते सातवी वयोगटासाठी ‘माझा स्वप्नातील भारत’ आणि ‘समुद्रकिनाऱ्यावर खेळणारी मुले’ असे विषय देण्यात आले होते.
२४व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात झालेल्या लहान मुलांच्या या चित्रकला स्पर्धेत शेकडो लहान मुले-मुली ‘चिंटू’ आणि चित्रांमध्ये रमली. पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रख्यात चित्रकार ‘चिंटू’फेम चारुहास पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मुलांना चारुहास पंडित यांनी आवडत्या ‘चिंटू’चे चित्र रेखाटून आनंद दिला. यावेळी चित्रकार चारुहास पंडित यांनी आबा बागुल आणि जयश्री बागुल यांचे कौतुक करून म्हटले की, “तुम्ही सौंदर्यदृष्टी असणारे भावी नागरिक घडवत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन करतो.”
प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत करून चित्रकार चारुहास पंडित यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “शाळा आणि कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच लहान मुलांमध्ये खेळ आणि चित्रकला, गायन, वादन, नृत्य अशा कलांचेदेखील शिक्षण द्यायला हवे. कलेमुळे आनंद तर मिळतोच, शिवाय कौतुकही होते. चित्रकार चारुहास पंडित यांनी चितारलेला ‘चिंटू’ आज महाराष्ट्रात घराघरात आणि मनामनात पोहोचला आहे. त्यांचा आदर्श लहान मुलांनी घ्यावा,” असे ते म्हणाले.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी मुलांना शुभेच्छा देऊन म्हंटले की, “लहान मुलांच्या मनातील भावविश्वाचे दर्शनच आजच्या चित्रांमधून दिसून येत आहे. या लहान मुलांमधील सुप्त गुण लक्षात घेऊन पालकांनी त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे. बी.ए., बी.कॉम. जरूर व्हा, त्याचबरोबर आपल्या जीवनाला कलेची जोड द्या आणि त्याची सुरुवात लहान वयापासूनच व्हावी,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम बागुल यांनी केले. प्राजक्ता ढवळे यांनी आभार मानले.
प्रत्येक गटात प्रथम क्रमांक ३,००० रुपये, दुसऱ्या क्रमांक २,००० रुपये व तिसऱ्या क्रमांक १,००० रुपये आणि उत्तेजनार्थ आणि दोन बक्षिसे दिली गेली. सर्व सहभागी मुला-मुलींना भेटवस्तू आणि खाऊ दिला गेला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
इयत्ता पहिली ते चौथी वयोगट
प्रथम – अनन्या कुंजीर
द्वितीय – रिमाश शिंदे
तृतीय – तन्मय शिंदे
इयत्ता पाचवी ते सातवी वयोगट
प्रथम – संस्कृती पाचंगे
द्वितीय – मयुरी भागवत
तृतीय – अर्जून महाडिक