निमित्त होते, सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या द ब्रदरहूड फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोनू शर्मा यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बंतारा भवन, बाणेर येथे करण्यात आले होते. द फाउंडेशनचे अध्यक्ष पवनकुमार जैन, संस्थापक जयप्रकाश गोयल, ईश्वरचंद गोयल, सचिव रविकिरण अग्रवाल, सहसचिव नरेंद्र गोयल, कोषाध्यक्ष संजय अग्रवाल, समन्वयक कर्नल नरेश गोयल, मुकेश कनोडिया, संजय अग्रवाल तसेच पुणे जिल्ह्यातील विविध क्लब व संघटनांचे पदाधिकारी तसेच मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील सर्व अग्रवाल समाजाच्या क्लब व संधटनांना एकत्रित आणणे व अग्रवाल समाजाला एका माळेत जोडण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शन सम्मेलनाचे आयोजन केले गेले होते.
सोनू शर्मा यांनी व्याख्यानाच्या सुरवातीलाच स्वत:च्या लौकिकार्थाने अपयशी कारकिर्दीची माहिती देत, उपस्थितांना आपलेसे केले. ‘आपल्याविषयी कुणी काहीही मत मांडले, तरी ते आपले वास्तव रूप असू शकत नाही,’ याची खूणगाठ स्वत:शी बांधा. फक्त अनुभव तुम्हाला यशापर्यंत नेत नाही. व्यवहारातला त्याचा नेमका वापर, तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकतो. ‘ज्ञान ही शक्ती आहे’, असे म्हणताना, ते ज्ञान तुमच्या बँकखात्यात प्रत्यक्ष दिसले पाहिजे, अन्यथा ते नुसते एक वाक्य ठरते, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. ज्ञानाची अंमलबजावणी केली, तरच ती शक्ती ठरते. प्रत्येक व्यक्तीपाशी यशाच्या अनेक शक्यता असतात. क्षमता असतात. गरज असते ती त्या क्षमतांच्या विकासाच्या प्रक्रियेची. प्रक्रियेमुळे यशाची खात्री निर्माण करता येते. मात्र, प्रक्रिया सुरवातीला कष्टप्रद असते. ती प्रतीक्षा करायला लावते. पण त्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर अपेक्षित यशप्राप्ती खात्रीने मिळते. आपली सहनशक्ती, परिश्रमातील सातत्य ढळू देऊ नका, असे शर्मा म्हणाले.
संधी मिळतील कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप होणारे बदल सकारात्मक पद्धतीने आपलेसे करा, त्यांचा स्वीकार करा, तेच तुम्हाला नव्या यशाच्या अनेक संधी मिळवून देतील. जे बदलांना सामोरे जात नाहीत, ते स्पर्धेतूनच काय व्यवसायातून बाहेर फेकले जातात, हे विधान सोनू शर्मा यांनी जगभरातील अनेक ताजी उदाहरणे देत पटवून दिले. तुमच्या क्षेत्रात पुढच्या 10 ते 25 वर्षांच्या काळात काय घडू शकते, याचा विचार आधी करा. भविष्यवेधी राहिलात तर पुढच्या बदलांची चाहूल आधी लागून, अनुरूप बदल त्वरित करू शकाल. कारण कोणतीही बाजारपेठ सतत नवे, वेगळे, आकर्षक काही शोधत असते. त्या नवेपणाला प्रतिसाद द्या, यश तुमचेच आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. मन सामर्थ्यशाली, शरीर मनाचे ऐकते : आपले मन अतिशय सामर्थ्यशाली आहे. मनात जे सातत्याने सुरू असते, आपले शरीर, कृती त्यानुरूप घडतात किंवा बिघडतात. त्यामुळे मन कणखर, धाडसी करा. आपल्या चुका सतत उगाळत बसू नका. पुढचा विचार करा. आपल्या यशाकडे जाताना ‘देणारे’ व्हा, ‘घेणारे बनू नका’, असा सल्ला शर्मा यांनी दिला.