शबनम न्युज | मुंबई
राज्यातील 2369 ग्रामपंचायत मधील 2950 सदस्य पदे तसेच 130 सरपंच पदासाठी रविवारी मतदान पार पडले. काही ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली असली तरी या निवडणुकीत सरासरी 74 टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने वर्तविला आहे. यामध्ये महायुती मधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने अनेक ठिकाणी बाजी मारली असून, महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसने खाती उघडली आहे. या पक्षाचे समर्थित पॅनेल विजयी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुती समर्थित पॅनेलचा 199 ठिकाणी विजयी झाला आहे. यामध्ये अजित पवार गट सर्वात पुढे असून, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाविकास आघाडी समर्थित पॅनेलचा 69 ठिकाणी विजयी झाला आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्या नंतर आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, अजित पवार गट समर्थित पॅनेलचा सर्वात जास्त ठिकाणी विजयी झाला आहे. अजित पवार गटाकडे 76 ग्रामपंचायती आल्या असून, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप समर्थित पॅनेल 74 ठिकाणी विजयी झाले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने ५८ ठिकाणी गुलाल उधळला आहे. महाविकास आघाडी बाबत बोलायचे झाल्यास ठाकरे गटाकडे 27 ,काँग्रेस कडे 27 आणि शरद पवार गटाकडे 26 ग्रामपंचायती आले आहेत.