शबनम न्युज | मुंबई
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. या निर्णयांनंतर देशातून सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत आहे. देशाची राजकीय एकात्मता राखणारे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलले होते, ते कोर्टाने आज वैध ठरवले त्याबद्दल मी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी ट्विट करत सदर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम ३७० रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. नरेंद्र मोदी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली. काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात. मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असं एकनाथ शिंदे म्हणाले.