शबनम न्युज | पुणे
शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी. जि. पुणे. या ठिकाणी ‘श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व रिंगण वार्षिक अंक’ यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांमध्ये संत विचारांचा जागर करण्यासाठी पहिली राज्यस्तरीय रिंगण वक्तृत्व स्पर्धा, दिनांक १७/१२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दोन सत्रा मध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी ‘भक्ती तीच जी धर्माचे कुंपणं उध्वस्त करते।’, ‘अवघा रंग एक व्हावा’, ‘संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही’, ‘बंडखोर शिष्य संत परिसा भागवत’ व ‘जातीभेदाच्या आजारावर संत विचारांच प्रिस्क्रिप्शन’ या विषयांचा समावेश करण्यात आला होता.
पहिल्या सत्रात स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना रिंगण मासिकाचे संपादक, मा. श्री. सचिन परब यांनी रिंगण वक्तृत्व स्पर्धेचा उद्देश, भूमिका आणि सध्याच्या काळात संत साहित्याचा शोध घेण्याची आवश्यकता कशी आहे हे सविस्तर मांडले.
उदघाटक ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, यांनी आधुनिक काळात संत साहित्याचा प्रसार आणि प्रचार करणे कसे आवश्यक असून, संत साहित्यामध्ये योगदान असलेल्या सर्व संतांच्या ज्ञानरूपी
अभंगाचा तरुणाईसाठी कसा उपयोग आहे या संदर्भात मत मांडले. संतसाहित्याने जातिभेदाच्या भिंती
काढून टाकल्या, तसेच रिंगण स्पर्धेतील स्पर्धकांनी जातीय विषमता नष्ट करून संत संप्रदायाच्या विचाराचा वसा आणि वारसा सर्व समाजामध्ये रुजविण्याचे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करून ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म / भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे संत तुकारामांच्या अभंगाचे प्रमाण सांगत
उद्घाटनपर भाषणात आपले मत व्यक्त केले व स्पर्धेमधील सहभागी स्पर्धकांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, मा. श्री. पांडुरंग कंद व मा.श्री. दिगंबर नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील महाविद्यालयातील एकूण ६९ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या मध्यंतरानंतर प्रसिद्ध पखवाज वादक पंडित दासोपंत यांचे पुत्र ऋषिकेश उंडाळकर यांनी पखवाज वादन केले तर त्यांना नगमा साथ ऋतुराज धुपकर यांनी दिली.
प्रथम सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री. वैभव गमे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मा.श्री. प्रवीण शिंदे यांनी मानले.
स्पर्धेच्या द्वितीय सत्रात बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करतांना, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. विशाल विलासराव तांबे यांनी महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण’ हे ब्रीद वाक्य आजच्या वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल किती महत्त्वपूर्ण असून संस्थेच्या निर्मितीपासून आतापर्यंतचा चढता आलेख स्पष्ट करून रिंगण वक्तृत्व स्पर्धेला शुभेच्छा देऊन स्पर्धकांचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘माहिती पुस्तिकेचे प्रकाशन’ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रिंगण वार्षिक अंकाचे संपादक मा.श्री. सचिन परब यांनी प्रास्ताविक करतांना रिंगण मासिकाचा निर्मिती इतिहास स्पष्ट करून रिंगण वक्तृत्व स्पर्धेला तीन वर्षात स्पर्धकांनी कसा नाविन्यपूर्ण सहभाग नोंदवला आणि आधुनिक काळात संत साहित्याचा समाजाला निश्चितच फायदा होईल असे मत व्यक्त केले.
या स्पर्धेचे परीक्षक मा. श्री. निलेश चव्हाण यांनी मंत्रिमंडळातून ज्याप्रमाणे विशिष्ट व्यक्तीची वर्णी मंत्री पदावर लागते त्याप्रमाणेच आणि स्पर्धकांमधून त्यांच्या विशिष्ट गुणांमधून योग्य निवड करावी लागते असे मत व्यक्त करून समाजाच्या डगमगत्या मनाला संत साहित्य आधार देते व आत्मविश्वा व समय सूचकता स्पर्धेसाठी कशा महत्त्वाच्या पायऱ्या आहेत हे विविध उदाहरणासह स्पष्ट केले.
स्पर्धेची द्वितीय परीक्षक मा. श्री. नंदन राहणे यांनी आम्ही सुद्धा परीक्षक होण्याअगोदर तुमच्या सारखेच स्पर्धक होतो असे मत व्यक्त करून स्पर्धेसाठी तयार मटेरियल पेक्षा आपली स्वतःची तयारी कशी असावी या संदर्भात विवेचन करीत बोलता येणे व बोलणे म्हणजे वक्तृत्व नसून मोजके व अभ्यासपूर्ण बोलणे म्हणजेच वक्तृत्व होय अशी भूमिका मांडून आपल्या कर्तृत्वाला वक्तृत्वाच्या बळावर उजळा द्यावा अशा शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी, मा.श्री. दत्ता बाळसराफ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी रिंगण परिवारांच्या संपूर्ण सदस्यांना शुभेच्छा देऊन स्पर्धकांनी योग्य वेळेत योग्य बोलले पाहिजे असे मत व्यक्त करून रिंगण सदस्यांनी वक्तृत्वाच्या पलीकडे जाऊन संत साहित्याचा वसा आणि वारसा चालवण्याची आवश्यकता व्यक्त केली आणि स्पर्धकांचा जमलेला मेळा म्हणजेच अथांग विचारांचा सागर आहे असे अनमोल विचार व्यक्त केले.
स्पर्धेचे द्वितीय अतिथी मा.श्री. राजीव खांडेकर ज्येष्ठ संपादक, ए.बी.पी. माझा यांनी रिंगण वक्तृत्व स्पर्धा घेणाऱ्या सर्व आयोजकांचे कौतुक करून रिंगण स्पर्धा अशीच चालू ठेवावी असे मत व्यक्त केले. आधुनिक काळात पत्रकारिता व मीडिया याची समाजाला असणारी आवश्यकता विशद करून केवळ आत्मविश्वास प्रबळ असून चालत नाही, तर त्याला अभ्यासाची जोड देणे कसे आवश्यक आहे या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत मत व्यक्त केले. भविष्यकालीन मीडियामध्ये काय बदल होईल हे सांगता येत नाही त्यासाठी आपण स्वतःमध्ये परिस्थिती व बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदल करण्याची आवश्यकता व्यक्त करून आपल्या स्व तयारीमध्ये संदर्भ, वाचन व अनुभव यांची जोड देण्याची गरज व्यक्त केली.
या प्रसंगी रिंगण वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त खालील विद्यार्थ्यांना पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उत्तेजनार्थ तृतीय अमोल गोळे, उत्तेजनार्थ द्वितीय – आदित्य देशमुख, उत्तेजनार्थ प्रथम – अभय आळसी, पाचवा क्रमांक- तेजस दिनकर पाटील, चौथा क्रमांक पराग बदरिके, तिसरा क्रमांक- यश रवींद्र पाटील, दुसरा क्रमांक इरफान इक्बाल शेख व पहिला क्रमांक – श्रुती अशोक बोरस्ते.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखेतील प्राचार्य, विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्पर्धक विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. द्वितीय सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री. – स्वामीराज भिसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मा. श्री. सचिन परब यांनी मानले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.