शबनम न्युज | पुणे
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २५ वे (रौप्य महोत्सवी) राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन येत्या १२ जानेवारीला ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात होत आहे. बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवी आणि राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बंधुता चळवळीचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना ‘सम्यक सत्यार्थी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी दिली.
प्रा. शंकर आथरे म्हणाले, “प्रकाश रोकडे यांच्या विशेष सन्मानासह संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार यंदा रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास प्रदान केला जाईल. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि गुरुनानक सेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल.”
“नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात १२ जानेवारी रोजी आयोजित या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील नामवंत संस्थांचा या संमेलनामध्ये सहभाग राहील. तत्पूर्वी, सभागृहाच्या संविधान कट्ट्यावर आनंदयात्रींचा स्वागत सोहळा होईल. त्यामध्ये बंधुताप्रेमी साहित्यिक, कवी, कलावंत आणि कार्यकर्ते सहभागी होतील. दुपारी दोन वाजता ज्येष्ठ कवी विलास ठोसर यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यपंढरी’ कवी संमेलन होईल. त्यामध्ये ज्येष्ठ गजलकार शिराज शिकलगार, दिनेश मोडोकर, संगीता झिंजुरके, रवींद्र यशवंतराव, संदीप राठोड, विलास सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग असेल,” असे प्रा. डॉ. चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले.
“संमेलनामध्ये ५० साहित्यिकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल. युवा उद्योजक मैनुद्दीन शेख, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, शिवव्याख्याते डॉ. प्रदीप कदम, डॉ. अशोक कुमार पगारिया, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, डॉ. विजय ताम्हाणे, डॉ. बंडोपंत कांबळे, प्रकाश जवळकर यांचा संमेलनामध्ये विशेष सहभाग राहील, असे मुख्य संयोजक प्रा. प्रशांत रोकडे यांनी सांगितले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. सहदेव चव्हाण आणि प्रा. सदाशिव कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.