शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. महापौर तथा शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यांनतर येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघेरेंसोबत फोन वर चर्चा केली. यावेळी अजित पवारांनी वाघेरेंना शिवसेनेत जाण्यास नकार दर्शवला.
फोन वर काय झाली चर्चा?
अजित पवार यांनी संजोग वाघेरे यांना सांगितले, “शिवसेनेत कशाला जातोय, नको जाऊ! आपण एवढी वर्ष सोबत काम केले आहे. आता शिवसेनेत जाण्याचे निर्णय कशाला घेतोय.” वाघेरे म्हणाले, “दादा! हा निर्णय माझ्या एकट्याचा नसून माझ्या कुटुंब, कार्यकर्ते, सहकार्यांचा देखील आहे आणि आता ते ठरले आहे.”
अजितदादांची साथ सोडल्याचे कारण काय?
आमच्या प्रतिनिधींनी संजोग वाघेरे यांना अजित पवार यांची साथ सोडल्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, “२०१४ आणि २०१९ च्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकांवेळी मी इच्छुक होतो, मात्र, मला त्यावेळी उमेदवारीकरिता संधी मिळाली नाही आणि यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने राष्ट्रवादीला संधी मिळणार नाही, त्यामळे जर मला लोकसभा निवडणूक लढवायची असेल किंवा वाढती महागाई, कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासर्वांचा विरोध करणे गरजेचे असल्याने मी विरोधी पक्षात जाण्याच्या विचार केला. या संदर्भात माझी सहकाऱ्यांसोबत तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली. त्यांनतर शिवसेनेत जाण्याचा मी निर्णय घेतला.”
ते म्हणाले, राष्ट्रवादीत राहून राज्यातील समस्येला विरोध करता येत नव्हता. राज्यातील, शहरातील महागाईचा प्रश्न असो किंवा बेरोजगारीची समस्या, कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व समस्यांविरोधात बोलता येत नव्हते. त्याचा विरोध करता येत नव्हता, यासाठी हा निर्णय गरजेचा होता. सध्या विरोधी पक्षात चांगले विरोधी नेते कोण असेल तर ते उद्धव साहेब आहेत, म्हणून त्यांच्या सोबत जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. येत्या ३० डिसेंबरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मी शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे, असे ते म्हणाले.