शबनम न्युज | ठाणे
सर्वंकष स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) लोकचळवळ व्हावी, ही मोहीम मुंबई, मुंबई महानगर, एमएमआर क्षेत्र अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची सुरूवात आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेत मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले होते.
यावेळी त्यांच्यासह महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक अशोक वैती, एकनाथ भोईर, योगेश जानकर, डॉ. जिंतेद्र वाघ, एकता भोईर, संध्या मोरे, शिल्पा वाघ, मनिषा कांबळे, महापालिकेचे अधिकारी -कर्मचारी, ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, संत निरंकारी सेवा मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, विविध महाविद्यालयांचे एनएसएस, एनसीसी चे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ठाण्यातील प्रदूषण तुलनेने कमी असून ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करावेत, जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करावीत. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिथे स्वच्छता असते, तिथे लोक कचरा टाकत नाहीत. आज बीएमसी पाईपलाईन येथे साठलेला कचरा साफ केला जातो आहे, त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करा, जेणेकरुन त्याचे दृश्य स्वरुप नागरिकांना दिसेल.