सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४’ अंतर्गत नववर्षाच्या स्वागतासाठी ‘भजनसंध्या’चे आयोजन
पुणे : ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन… अच्युतम केशवम राम नारायणम… इतनी शक्ती हमें देना दाता… बोलो राम बोलो राम… जग में सुंदर है दो नाम… अशा भावभक्तीपर भजनांनी सरत्या वर्षाची सायंकाळ रसिकांना अनुभवायला मिळाली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने भारतीय संस्कृती आणि परंपरा, अभिजात संगीत, आरोग्य संपन्नता, परस्पर नातेसंबंध यांची ओळख युवा वर्गाला व्हावी, या हेतूने ‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात अनुप जलोटांच्या ‘भजनसंध्या’ कार्यक्रमातील बहारदार भजनांनीरसिकांची मने जिंकली. यावेळी अनुप जलोटा यांना गायन-संगीत कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभारत राष्ट्रीय सन्मान २०२३’ प्रदान करण्यात आला.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, लेखक किशनलाल शर्मा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, बावधन परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे (एनआयपीएम) पदाधिकारी उपस्थित होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रशांत पितालिया यांनी केले.
प्रा. डाॅ. संजय बी. चोरडिया यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली. “जगभरात सुरु असलेल्या अशांततेच्या आणि नकारात्मक वातावरणामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पहायला मिळते. ती नकारात्मकता दुर करण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सकारात्मक वातावरण तयार होण्याची आज गरज आहे. अनुप जलोटाजींचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभते. त्यांच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळते. आजही त्यांच्या सुमधुर भजनांनी वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.