शालेय वयापासून प्रगत शिक्षण, नवतंत्रज्ञानाचे
मार्गदर्शन मिळावे
सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांचे मत; बाल शिक्षण मंदिर शाळेचा शताब्दी सांगता, स्मरणिका प्रकाशन सोहळा
‘बाशिमं’चे माजी विद्यार्थी एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचा विशेष सत्कार
पुणे : “कृत्रिम बुद्धिमतेमुळे जग कल्पनेच्या पलीकडे बदलत आहे. पुढील काही वर्षात पेट्रोल-डिझेलवरील प्रदूषित गाड्या जाऊन इलेक्ट्रिक गाड्या येतील. या बदलत्या जगात नव्या पिढीला प्रगत शिक्षण, नवतंत्रज्ञान, नवे प्रवाह याचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांशी संवाद ठेवावा. त्यातून मुलांना नवनवीन कल्पना मिळतील. त्यांच्यातील कल्पकता विकसित होण्यास मदत होईल,” असे मत माजी विद्यार्थिनी व उद्योजिका सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांनी केले.
भांडारकर रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो) संचालित बाल शिक्षण मंदिर शाळेचा शताब्दी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळा बुधवारी पार पडला. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मएसोचे अध्यक्ष, माजी विद्यार्थी, एअर मार्शल (नि.) भूषण गोखले होते. प्रसंगी माजी विद्यार्थी म्हणून भूषण गोखले यांच्यासह आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मएसोचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, शाला समितीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक कानडे, बाल शिक्षण मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण, बाल शिक्षण मंदिर शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, पालक, देणगीदार, हितचिंतक आदी उपस्थित होते.
सुलज्जा फिरोदिया-मोटवानी म्हणाल्या, “माझे वडील, मोठी बहीण याच शाळेत शिकल्याने मलाही इथेच प्रवेश घ्यावा, असा हट्ट धरला होता. वडील-बहिणीपाठोपाठ माझे नावही शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे यादीत माझे नाव आले. शाळेने मला आत्मविश्वास, जिज्ञासू वृत्ती दिली. शिक्षकांनी संस्कार, जिव्हाळ्याचे नाते दिले. दयाळूपणा, करुणेचे चैतन्यमय वातावरण असलेली ही माझी शाळा कायम शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणून ओळखली जाईल.”
डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, “माझ्या शिक्षणाची सुरुवात ज्या शाळेत झाली, त्या शाळेच्या शताब्दी महोत्सवात सत्कार होणे भाग्य आहे. पश्चिम घाट, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अभ्यास करताना या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी सुचवता आल्या. परखडपणे अहवाल सादर केला. आत्मविश्वासाने हे सगळे काम करू शकलो, तो आत्मविश्वास मला बालशिक्षण शाळेने दिला.”
बाबासाहेब शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक विवेक कानडे यांनी केले. शिक्षिका तनुजा सोनपाटके यांनी सूत्रसंचालन केले. सुनिता चव्हाण यांनी आभार मानले.
———————
कोट
कोट
पर्यावरण, विकास याचा समतोल हवा
“पर्यावरण, विकास यांच्यातील समतोल साधण्याची गरज आहे. विविध प्रकारचे प्रदूषण टाळून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकलचा पर्याय प्रभावीपणे राबवायला हवा. बालशिक्षण मंदिर शाळेने संस्कार, स्वाभिमान, आत्मविश्वास दिला. विविध क्षेत्रातील मान्यवर घडवले. आज शाळेच्या या शंभर वर्षाची यशस्वी वाटचाल पाहताना आपण त्याचा एक भाग आहोत, याचा अभिमान वाटतो.”
– एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी