शबनम न्यूज , प्रतिनिधी
“मराठी भाषेला ” अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी शिवसेना युवा नेते सुरज बाबर यांनी केली आहे. सदर मागणी चे निवेदन सुरज बाबर यांनी देशाचे राष्ट्रपती, संस्कृति मंत्रालय,व मा प्रधान सचिव ,मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र राज्य. यांच्या कडे पाठविले आहे.निवेदनात सुरज बाबर यांनी नमूद केले आहे कि
महाराष्ट्रात ” २७ फेब्रुवारी ” हा दिवस ” मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो.
माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके….’ असं मराठी भाषेचं वर्णन ” संत ज्ञानेश्वर ” केलं आहे. मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे असं असलं तरी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केला जात आहे. हा प्रश्न सध्या केंद्र सरकारच्या अख्यत्यारित असून लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळेल अशी आशा मी अखंड महाराष्ट्राच्या वतीने आपणाकडून अपेक्षीतो.
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. मराठी
भाषा प्राचीन आणि तिचे साहित्य श्रेष्ठ आहे.
भाषेचे वय जवळपास २००० वर्ष आहे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण आहे व तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम आहे
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून केला जातो.
वर्ष २०१३ पासून याबाबत प्रयत्न सुरु असून राज्य शासनाने साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात मराठी भाषेला २ हजार वर्षांचा इतिहास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मराठी भाषा प्राचीन असून या भाषेत सतत श्रेष्ठ दर्जाची वाङ्मय निर्मिती होत राहिली आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकषही मराठी भाषा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
“भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली.
सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
इ. सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके ९०५ मधील असून ‘श्री चामुण्डेराये करविले’ असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात.
शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी ‘परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली.
महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी ‘भागवत’ ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे १३ व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.
कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल निरनिराळ्या सत्ता होय. त्यापैकी १२५० ते १३५० या काळातील यादवी सत्ता, १६०० ते १७०० या काळातील शिवरायांचीसत्ता, १७०० ते १८१८ पेशवाई सत्ता आणि १८१८ पासून इंग्रजी सत्ता. यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले. शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो. त्या काळात राजकीय पत्रव्यहार, बखरी लिहिणसाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. या पत्रांचा समावेश ‘मराठी रुमाल’ किंवा ‘पेशव दफ्तर’ या सारख्या संग्रहातून करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आज्ञापत्रात’ मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते. तसेच यावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवर पडत असतो, हे सिद्ध होते.
आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे
यापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार श्री सुभाषजी देसाई साहेब यांच्याकडून मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत प्रयत्न केले गेले तसेच त्यावेळेस राज्यातील साहित्यिक, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राष्ट्रपतींना पोस्ट कार्ड लिहिली आहेत. जनतेनी लिहिलेली लाखो पोस्टकार्ड राष्ट्रपतींना पाठविण्यात आली तसेच मराठी जनभावनेची राष्ट्रपती नक्कीच दखल घेतील व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देतील, असा विश्वास सुरज बाबर यांनी आपल्या निवेदनात दर्शविला आहे.