शबनम न्युज :प्रतिनिधी
पिंपरी :- केंद्र सरकारच्या विविध महत्वाकांक्षी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद भेटत आहे. शहरात ४२ ठिकाणी आणि प्रत्येक प्रभागातील २ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे वाहन भेट देणार आहे. आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी या वाहनाने भेट दिली असून ५ हजारपेक्षा जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ या वाहनाद्वारे देण्यात आला असून महिलांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे.
केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून याच योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्यामध्ये आधार कार्ड दुरूस्ती केंद्र, पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, स्वनिधी नोंदणी कॅम्प आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान पथविक्रेता, आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस योजना, अमृता योजना आदी विविध योजनांचाही यामध्ये समावेश आहे.
‘अ’ प्रभागातंर्गत रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे ३०० पेक्षा जास्त, ब क्षेत्रीय कार्यालय येथे ४०० पेक्षा जास्त तर छत्रपती संभाजी महाराज चौक, निगडी प्राधिकरण येथे २०० पेक्षा जास्त नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेस उपस्थित होते. विरंगुळा केंद्र, मोरवाडी येथे २३० पेक्षा जास्त आणि काळभोरनगर, चिंचवड येथे २५० पेक्षा जास्त तसेच विकासनगर, किवळे येथे ३०० पेक्षा जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाला भेट दिऊन विविध योजनांचा लाभ घेतला.
‘ब’ प्रभागातंर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी गावठाण येथे ३५० पेक्षा जास्त, वेताळ नगर, चाफेकर चौक येथे २८० पेक्षा जास्त तर तानाजी गावडे व्यायामशाळा, तानाजीनगर येथे २५० पेक्षा जास्त नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. तर पंचनाथ चौक, काळेवाडी येथे ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाला भेट देऊन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतला.
विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मधुमेह, रक्तदाब, कुष्ठरोग, हिमोग्लोबीन, मलेरिया, डेंग्यू तसेच इतर रोगांच्या तपासण्या मोफत करण्यात येत आहेत. तरी या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.