शबनम न्युज | पिंपरी
शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांना मिळणारे निवृत्तीवेतन हे आता त्यांच्या अविवाहित मुलीच्या बाबतीत ती 24 वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत अथवा विधवा किंवा घटस्फोटीत असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही, अशा मुलीला मिळणार असल्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
याबाबत केंद्र सरकारच्या शासकीय सेवेत असलेल्या मृत आई-वडिलांचे कुटुंब निवृत्तीवेतन त्यांच्या अविवाहित घटस्फोटीत व विधवा मुलींना वय वर्षे 24 नंतरही चालू राहावे, हा कायदा प्रथमपासूनच आहे, याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारमध्येही हा नियम लागू व्हावा, अशी मागणी चिंचवड येथील प्रतिभा कुलकर्णी यांनी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्याकडे केली.
या प्रकरणाचा अभ्यास करून आमदार उमा खापरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली या लक्षवेधीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे कारवाई होऊन 8 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना जारी होऊन केंद्र सरकार प्रमाणेच हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील अविवाहित विधवा व घटस्फोटीत मुलींचे भविष्य सुखकर व सुरक्षित झाले आहे याबद्दल आमदार सौ.उमा खापरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे व ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हि संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंददायी भेट असल्याचेही उमा खापरे यांनी सांगितले आहे.