शबनम न्युज | मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या भाषणात ‘ये मोदी की गॅरंटी है’ म्हणत असल्याचे आपण ऐकतो. तसेच मोदींच्या अनेक जाहिरातींमध्येही हा शब्दप्रयोग सातत्याने वापरलेल्या दिसून येतो. त्याच प्रकारे जसं देशात मोदींची गॅरंटी चालते, तसं आता राज्यात नोकरीची गॅरंटी असणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठाणे येथील नमो रोजगार मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, नमो महारोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा ठाण्यात पार पडला असून, या मेळाव्याचा माध्यमातून राज्यातील तरुणांच्या हाताला काम आणि स्वयं रोजगारांच्या संधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. राज्य सरकारने 75 हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. कौशल्य विकासाच्या माध्यमातून अजून एक लाख लोकांना काम दिले. नारीशक्ती अभियानाच्या माध्यमातून बचत गटांना बळ देऊन त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात दोन हजार ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू केल्याचे सांगितले. त्यामुळे तरुणांचा देशाला स्वयंरोजगार देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तर पत्रकारांशी बोलताना जसे देशात मोदी की गॅरंटी आहे, तसे राज्यात नोकरीची गॅरंटी देण्यात आल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.