महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान पार पडणार
शबनम न्युज | दिल्ली (वृत्तसंस्था)
लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सर्वांची प्रतीक्षा संपली असून, १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी राज्यं जोडली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान पार पडणार, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रसंगी राजीव कुमार यांनी निवडणूक जाहीर करताना अनेक शेरो-शायरी करत निवडणूक जाहीर केली आहे.
५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात ४८ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान ५ जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार असून यावेळी ८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत ११ जागांसाठी मतदान होणार आहे. तर, १३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील प्रक्रियेतही ११ जागांसाठी मतदान होईल. २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.
निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?️
️पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
️दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
️चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
मतमोजणी – ४ जून