शबनम न्युज | पिंपरी
२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे संस्थेच्या चिंचवड येथील ‘यशस्वी भवन’ येथे जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचे व जलस्रोतांचे महत्व आणि व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनर करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी यावेळी प्रास्ताविक करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाच्या जागतिक जल दिनानिमित्त ‘शांततेसाठी पाणी’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित केली असून हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जलस्रोत यामुळे पाण्याचे संकट अधिक तीव्र बनत चालले आहे.यासाठी सर्वांनीच व्यक्तिगत आणि सामुहिक पातळीवर पाणी बचतीचे उपाय कटाक्षाने अंमलात आणणे गरजेचे आहे.
आरोग्य, स्वच्छता, शेती व उद्योग अशा सर्व क्षेत्रात पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्नपूर्वक परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील कृतिशील व्हायला हवे असे आवाहन डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.
याप्रसंगी प्रा. महेश महांकाळ यांनी त्यांच्या मनोगतातून पाण्याचे मानवी जीवनातील महत्व विविध उदाहरणांद्वारे पटवून देत पाण्याशिवाय मानवी जीवन कसे भयावह बनू शकते हे सांगितले तसेच व्याख्याने, परिसंवाद यांच्यासोबत पाणी
बचतीच्या दुष्टीने आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे योग्य व्यवस्थापन कसे करायला हवे यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पाणी बचतीचा निर्धार पक्का करण्यासाठी विद्यार्थ्यांना पाणी बचतीची सामूहिक शपथ दिली. या मार्गदर्शन सत्रात एमबीए व एमसीए चे विदयार्थी व संस्थेचे प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते.