शबनम न्युज | पुणे
बारामती शहर आणि तालुका दोन गोष्टींसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. काळ्या आईची सेवा करणारा कष्टकरी शेतकरी, ज्या शेतकऱ्याने कष्टाने शेती उत्पादन वाढविले. कारखानदारी उभे करून लोकांचे जीवन समृद्ध केले .शेती जशी संपन्न होते, तसा व्यापार वाढतो. बाजारात खरेदी करण्याची ताकद वाढली की व्यापार समृद्ध होतो. त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ते बारामती येथे आयोजित स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात बोलत होते.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले, त्या काळात बारामतीत कापसाचे जिन बघायला मिळायच्या. आपल्या भागात कापूस आणि गुळाची बाजारपेठ होती. माळेगाव, सणसरचा कारखाना झाल्यानंतर गुऱ्हाळे बंद झाली. साखर आल्यानंतर बाजारपेठे वाढली. लोकांची क्रयशक्ती वाढली. देश आणि राज्य पुढे जाण्यासाठी व्यापार वाढला. बारामतीत व्यापार संघटना अनेक वर्ष काम करते, पण यामध्ये छोट्या लोकांचा विचार नव्हता हे आज लक्षात आले. छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हातभार लावतात. या छोट्या व्यावसायिकांचे अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला. काही अडचणी असल्यास आम्हाला संपर्क साधा, निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या व्यापारांची पुन्हा बैठक घेऊ, असे शरद पवार म्हणाले.