शबनम न्युज | पुणे
शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. पुरंदर मध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत विजय शिवतारे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कोणत्याही स्थितीत ही निवडणूक लढवायचीच असा निर्धार आम्ही केला होता. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत फोनवर झालेल्या चर्चेनंतरही आम्ही आमचे भूमिकेवर ठाम होतो. मात्र, 26 तारखेला मला मुख्यमंत्र्यांची विशेष कार्य अधिकारी खतगावकर यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आपल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्रींना अडचण होत आहे. महायुतीचे वातावरण बिघडून राज्यात महायुतीचे दहा -पंधरा खासदार पडू शकतात. मताचे विभाजन होऊन महाविकास आघाडीचा फायदा होईल, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने हे सगळे सांगितल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो. त्यानंतर 28 तारखेला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत रात्री अकरा ते दोन अशी तब्बल तीन तास चर्चा झाली. यानंतर चर्चेत मी विकास कामांबद्दल असलेल्या माझ्या मांडण्या मांडल्या. त्या बाबत सकारात्मक प्रतिसाद आल्याने मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.