शबनम न्यूज | पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कीव येत आहे, महाराष्ट्रात ते कधीही इतक्या वेळा आले नाहीत. या वखवलेल्या आत्माने शेतकऱ्यांकडे पाहावे, महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही. आम्ही बोलतो ते करून दाखवतो. पवार यांनी कर्जमाफी केली, आम्हीही कर्ज माफ केले. आता बँकेचा 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा कोणी केला? हे त्यांनी सांगावे, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीचे पुणे आणि बारामती लोकसभेतील उमेदवार रवींद्र धंगेकर व सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे मंगळवारी रात्री ठाकरे यांची सभा झाली. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मदन बाफना, शिवसेनेचे सचिन अहिर, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात मोदी यांना लक्ष केले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत, चांगली गोष्ट आहे. देशातील चार राज्यांची निवडणूक एका टप्प्यात व महाराष्ट्रातील निवडणुकीला मात्र पाच टप्पे याचे कारण त्यांना इथे भीती आहे. तुम्हाला सत्ता काय लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी दिली आहे का? असे प्रश्न ही पवार यांनी यावेळी केला. हा सत्तेचा गैरवापर आहे. महागाई, बेरोजगारी कशावरच त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. हे चित्र बदलायचे असेल तर देशात सत्ता बदल करण्याची गरज आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.