शबनम न्यूज | नाशिक
नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कवीकट्टासाठी मावळ तालुक्यातील शिक्षक कवी संजय जगताप यांच्या “मावळमाती “या कवितेची निवड झाली.त्यांनी उत्तम रितीने काव्य सादर करुन मावळचा डंका वाजवत रसिकांची मने जिंकली.यावेळी व्यासपीठावर कवीकट्टा प्रमुख राजन लाखे,प्रसाद देशपांडे तसेच निवड कमिटी अध्यक्ष संतोष वाटपाडे हे उपस्थित होते.
नाशिक मधील नॉलेज सिटी मधील कुसूमाग्रज नगरीत सदर संमेलन ३,४ व ५ डिसेंबर रोजी संपन्न झाले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर होते तर पानिपतकार लेखक विश्वास पाटील,गीतकार जावेद अख्तर,फादर फ्रान्सिस दिब्रिटो, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेते दिलिप प्रभावळकर, डॉ.सदानंद मोरे,मा.संमेलनाध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख, सुप्रसिद्ध कवी संदीप खरे इ.मान्यवर उपस्थित होते.
कवीकट्यावर संजय जगताप यांनी ‘मावळमाती’ या कवितेचे सादरीकरण करुन काव्य रसिकांची उत्तम दाद मिळवली.
जगताप यांची आजपर्यंत पाच पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी अनेक कार्यक्रमातून व साहित्य संमेलनांमधून आपल्या कविता सादर केल्या आहेत.आपली कार्यरत शाळा ‘टाकवे खुर्द’ या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचेही ‘अक्षरफुलं व अक्षरधारा’ ह्या बाल काव्यसंग्रहांची निर्मिती त्यांनी केली आहे.कवीकट्ट्यात कविता सादर करुन मावळचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल जगताप यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.