शबनम न्युज | मुंबई
दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला चांगलंच झापलं आहे. ते म्हणाले, चला एकदा सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व शेंडीधारी नसून राष्ट्रीयत्वाशी जोडलं गेलेलं आहे. मग व्याख्या स्पष्ट आहे. विचार सोडले, विचार सोडले म्हणत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितलं आहे की जो या देशावर प्रेम करतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे. प्रत्येकानं आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा. घराबाहेर पाय ठेवला तर हा देश हाच आमचा धर्म असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात केले आहे.
पण जर कुणी त्याच्या धर्माची मस्ती आमच्यासमोर करायला लागला, तर आम्ही कडवट देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहू. नुसती जपमाळ ओढून हिंदू होत नाही. तुमच्या हातात जपमाळ असताना समोर दहशतवादी उभा राहिला, तर राम राम म्हणून तो पळणार नाही. तुमच्याही हातात स्टेनगनच असायला हवी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीर घेऊन दाखवा – ठाकरे
पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही तुकडा परत घेऊ शकला नाहीत. चीन लेह, लडाखमध्ये घुसतंय. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, हे कशाला हवेत गद्दार. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय? पण तिकडे शेपट्या घालायचे आणि इकडे येऊन पंजे काढायचे ही काय मर्दुमकी आहे? असा प्रश्न ही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे – उद्धव ठाकरे
देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे.
आपल्या लष्करात औरंगजेब नावाचा गनमॅन होता. सुट्टीवरून घरी जात असताना त्याचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी त्याचं प्रेत आपल्या सैन्याला मिळालं. त्याला दहशतवाद्यांनी पळवलं होतं. तो धर्माने मुसलमान होता. त्याला पळवणारे दहशतवादीही मुसलमान होते. पण तरी त्याला दहशतवाद्यांनी सोडलं नाही कारण तो भारताच्या बाजूने लढत होता. तो औरंगजेब मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे हे हिंदुत्व उघड आहे, जाऊन सांगा कुणाला सांगायचंय.
बिल्किस बानो प्रकरणात बोलताना ठाकरेंनी शिंदे सरकारला झापलं
बिल्किस बानो गुजरात दंगलीमध्ये गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या चिमुकलीचा खून करण्यात आला. आरोपी शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही, गावी गेल्यावर त्यांचा स्वागत सत्कार केला. या गोष्टी तुमच्या पक्षात घडत असतील, तर इतर लोक महिलाशक्तीचा काय आदर राखणार? असा ही प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
मी मुख्यमंत्री असताना कोणी माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं – ठाकरे
माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे. सरकार झालं, तेव्हा अनेकांनी सांगितलं की ते काँग्रेस बघा..काहीतरी गडबड आहे. शरद पवार तुम्हाला माहिती आहे.. नीट लक्ष ठेवा हां… अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले.. मग गद्दार कोण?
आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसं जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे.
मला चिंता नाही, मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा मुलगा – ठाकरे
अतीवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार आहे. म्हणून मला चिंता नाहीये. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा मुलगा आहे. पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटं बघत मोठा झालो आहे. आजही माझ्या हातात काहीच नाहीये. माझ्यासोबत चालायचं असेल, तर निखाऱ्यावर चालण्याची तयारी हवी. जसं मी माझ्या पित्याला वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसंच मी तुम्हाला वचन देतोय.. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
एका अर्थी झालं ते बरं झालं. बांडगुळं सगळी छाटली गेली. ही बांडगुळं आपण आपल्या फांद्यांवर पोसत होतो. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की बांडगुळांची मुळं फांद्यांमध्ये असतात, पण फांद्यांची मुळं जमीनीत असतात. बांडगुळाला स्वत:ची ओळख नसते. तो सांगू शकत नाही की तो बांडगूळ आहे. अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल. असंही ठाकरे म्हणाले.